महाराष्ट्रातील राजकारण सत्तेच्या समीकरणांची प्रयोगशाळा ?
महाराष्ट्रातील राजकारण सत्तेच्या समीकरणांची प्रयोगशाळा ? महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आज पाहिले की मनात एकाच वेळी अनेक विरोधाभासी भावना दाटून येतात. एकीकडे अभिमानाची आठवण येते कारण हा तोच महाराष्ट्र आहे ज्याने भारताला सामाजिक सुधारणांची दिशा दिली, प्रबोधनाची परंपरा निर्माण केली, सहकाराचे मॉडेल उभे केले आणि लोकशाही मूल्यांना व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न केला. पण दुसरीकडे वास्तव इतके वेदनादायक आहे की त्या अभिमानावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. कारण आज महाराष्ट्राचे राजकारण विचारांपेक्षा व्यवहारांचे, तत्त्वांपेक्षा सत्तेचे आणि जनहितापेक्षा समीकरणांचे झाले आहे. या परिवर्तनाचा सर्वात ठळक, आणि कदाचित सर्वात धोकादायक पैलू म्हणजे ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीचा केवळ वाढता प्रभाव नव्हे, तर तिचे राजकीय व्यवस्थेत झालेले सामान्यीकरण. एकेकाळी महाराष्ट्रातील राजकारण हे विचारांचे रणांगण होते. येथे संघर्ष होता, मतभेद होते, पण त्या मतभेदांना वैचारिक अधिष्ठान होते. विचारपरंपरेला एक स्पष्ट सूत्र होते की राजकारण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे, सत्ता हे अंतिम ध्येय नाही. पण आज परिस्थिती उलटी झालेली दिसत...