भीतीच्या सावटाखालील भक्ती : श्रद्धेचा बदलता चेहरा
भीतीच्या सावटाखालील भक्ती : श्रद्धेचा बदलता चेहरा आजकाल देवाची भक्ती, श्रद्धा, उपासना, व्रत-वैकल्ये, मंदिरदर्शन, यात्रा, महाराजांचे प्रवचन, कीर्तन-भजन या सर्व धार्मिक कृतींच्या मागे खरी भावना कोणती आहे, हा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येत आहे. बाह्य स्वरूपावरून पाहिले तर धर्माचे आचरण वाढल्यासारखे दिसते; मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी, यात्रांना उसळणारे लोंढे, सत्संगांना मिळणारा प्रतिसाद, सोशल मीडियावर सतत शेअर होणारे धार्मिक संदेश – हे सर्व पाहून आपण म्हणू शकतो की समाज अधिक धार्मिक झाला आहे. पण या धार्मिकतेच्या मुळाशी खरोखरच नितळ श्रद्धा आहे का, की भीती, असुरक्षितता आणि नैराश्य यांचे सावट आहे? आजच्या वास्तवाचा प्रामाणिक विचार केला तर जाणवते की अनेकदा भक्ती ही प्रेमातून नव्हे तर भीतीतून जन्म घेत आहे. पूर्वीच्या काळात श्रद्धा ही जीवनशैलीचा भाग होती. देव म्हणजे कुटुंबातील एक सदस्य, सुख-दुःखाचा साक्षीदार, मार्गदर्शक आणि आधार. देवाशी संवाद हा भीतीचा नव्हे तर आपुलकीचा असे. संकटात देवाला हाक मारली जाई, पण ती हाक विश्वासाची असे; “तू आहेस ना” या भावनेची. आज मात्र परिस्थिती वेगळी दिसते. “देव रागा...